DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – रमजान मुलानी
सांगली :- मिरज तालुक्यातील ढवळी ते वड्डी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्यामुळे नागरिकांचा संताप टोकाला पोहोचला होता. अपूर्ण रस्त्यामुळे रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर ढवळी गावचे माजी सरपंच श्री. विजय रंगराव पाटील यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट आत्मदहनाचा इशारा दिला. रस्ता वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे असा इशारा द्यावा लागतो, हे दुर्दैवी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तातडीने हालचाल करत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. परिणामी, अनेक दिवस ठप्प असलेले काम अखेर पुन्हा सुरू करण्यात आले. दरम्यान, आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विजय पाटील यांना विश्रामबाग पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून ताब्यात घेतले होते. या घटनेची माहिती मिळताच ढवळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. मात्र पुढील तपासाअंती कोणताही गंभीर गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विजय पाटील यांच्या मुक्ततेनंतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, “इशारा दिल्यावरच प्रशासन जागं होतं का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच रस्त्याचे काम तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.



