🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संदीप सकट
चंदगड – शेताच्या हद्दीवरून सुरू असलेल्या वादातून शेजारील शेतातील रताळी पिकावर तणनाशक फवारून सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी तुडीये येथील तिघांविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कल्लप्पा तुकाराम जाधव (वय ६५, रा. तुडीये, ता. चंदगड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपींची शेती शेजारी असून संबंधित शेतजमिनीच्या मालकीबाबत दिवाणी न्यायालयात दावा प्रलंबित आहे.११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत तुडीये-हाजगोळी रोडलगत गट क्रमांक ८३१ मधील फिर्यादीच्या शेतातील सुमारे तीन एकर रताळी पिकावर तणनाशकाची फवारणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या फवारणीमुळे रताळी पिकाचे मोठे नुकसान झाले असून सुमारे दोन लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, या प्रकाराबाबत तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही. अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.५८ वाजता
पोलिसांनी उमाजी कल्लाप्पा हुलजी, कार्तिक उमाजी हुलजी आणि कल्लाप्पा उमाजी हुलजी (सर्व रा. तुडीये) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ३२४(५), ३५२, ३५१(२) व ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.गुन्ह्याची प्रत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चंदगड यांच्या न्यायालयात पाठविण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल १३४९ पाटील करीत आहेत. गुन्हा पोलीस हेड कॉन्स्टेबल ९७० राजीगरे यांनी दाखल केला आहे.



