कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ | आर्थिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक संशय
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी रमजान मुलानी
अलकुड (एस), ता. कवठेमहांकाळ : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) शिवारात २१ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना १९ ऑगस्ट २०२६ रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे अलकुड (एस) परिसरासह मिरज पूर्व भागात खळबळ उडाली आहे.
मृत युवकाचे नाव प्रणव प्रकाश कदम (वय २१) असे आहे. अलकुड (एस) गावाच्या हद्दीत रस्त्यालगत प्रणव याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणा आढळून आल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, या हत्येमागे शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेला आर्थिक वाद कारणीभूत असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, तपासातूनच त्याचा उलगडा होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांकडून आवश्यक पुरावे संकलित करण्यात येत आहेत.
हत्येमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहारांचा नेमका संबंध काय आहे आणि हल्ल्याचे कारण काय होते, या सर्व बाबींचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मिरज ग्रामीण पोलीस व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तपास वेगाने सुरू असून, प्रणव कदम यांच्या हत्येचे गूढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. संशयितांची चौकशी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे या प्रकरणातील पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.



