🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
मिरज प्रतिनिधी-राजेंद्र पवार
ढवळी, ता. मिरज : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सन २०२६-२७ अंतर्गत पिक भुईमूग विषयावरील शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी मौजे ढवळी येथे करण्यात आले. ढवळी हायस्कूलच्या परिसरात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांनी श्री. आनंदा माने यांच्या सोयाबीन प्लॉटला भेट देऊन ‘फुले दुर्वा’ या वाणाची पाहणी केली. त्यानंतर श्री. हारुगरे सर यांच्या भुईमूग प्लॉटला भेट देऊन पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी पिकाची वाढ, व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमात मा. श्री. सदाशिव निकम, मंडळ कृषी अधिकारी, मिरज यांच्या हस्ते उपस्थित अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मा. डॉ. एस. बी. महाजन, सहाय्यक प्राध्यापक, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज यांनी सोयाबीन व भुईमूग पिकांवरील विविध किडी, रोग, त्यावरील उपाययोजना तसेच पिक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पिकांची योग्य निगा, रोग-किडींचे वेळीच नियंत्रण आणि उत्पादनवाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
तसेच मा. श्री. दराडे, उपविभागीय कृषी अधिकारी, मिरज यांनी गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच शेतीमालाचे उत्पादन, गुणवत्ता व उत्पन्न वाढविण्याच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.
मा. श्री. मिलिंद निंबाळकर यांनी डिजिटल शेती शाळेची संकल्पना, त्याची उपयुक्तता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कृषीविषयक माहिती पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यात विविध कृषी विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या प्रशिक्षण कार्यक्रमामुळे सोयाबीन व भुईमूग पिकांबाबत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, किड-रोग नियंत्रण तसेच गट शेती आणि डिजिटल शेतीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधींची माहिती मिळाली.
कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. आनंदा माने यांनी उपस्थित मान्यवर, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि सर्व शेतकऱ्यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन यामुळे ढवळी येथील राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.



