🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी. संदीप सकट
चंदगड :- चंदगड येथील जंगमहट्टी परिसर हादरवून सोडणाऱ्या हर्षद या महाविद्यालयीन तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणात चंदगड पोलिसांनी धडक कारवाई करत मुख्य आरोपीसह पाचव्या संशयिताला गजाआड केले आहे. निवृत्ती नागोजी शिंगाळे (वय २८, रा. नगरगाव, ता. चंदगड) असे या अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ‘स्कॉर्पिओ’ गाडीही जप्त केली आहे.
अपहरणासाठी वापरली स्वतःची स्कॉर्पिओ
चंदगड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्हा रजिस्टर नंबर २९४/२०२६ (BNS कलम १३७(२), १४०(१), १०३(१), २३८, ३(५)) च्या तपासादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेला निवृत्ती शिंगाळे हा यापूर्वी अटक केलेल्या दिलीप कुट्रे या आरोपीचा मित्र आहे. दोघेही ‘स्वप्नवेल पॉईंट’ येथील एका हॉटेलमध्ये एकत्र कामाला होते. संशयित निवृत्तीने हर्षदचे स्वतःच्या सिल्व्हर रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून (क्र. MH 02 BD 7087) अपहरण केले. हत्येनंतर मृतदेह ‘स्वप्नवेल पॉईंट’जवळ नेण्यासाठी त्याने मदत केली आणि त्यानंतर ती गाडी बेळगाव येथील एका गॅरेजमध्ये लपवून ठेवली असल्याचे तपासात समोर आले आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या हुशारीने कट उघड
गुन्हा लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी अत्यंत शिताफीने डाव आखला होता. मयत हर्षदची दुचाकी आरोपी दिलीप याने बेळगावजवळील कंग्राळी-यमनापूर येथील एका मित्राकडे लपवून ठेवली होती. मात्र, चंदगड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कर्नाटकशी जोडलेले धागेडोरे शोधून काढले आणि सर्व कट उधळून लावला.
तपासाला नवीन वळण; आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता
या गुंतागुंतीच्या हत्या प्रकरणात आता नवीन वळण आले असून या कटात सहभागी असलेल्या आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या गुन्ह्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणी मदत केली आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
नागरिकांमधून कठोर शिक्षेची मागणी
क्षुल्लक राग किंवा प्रेमसंबंधाच्या वादातून एका महाविद्यालयीन तरुणाची अत्यंत थंड डोक्याने कट रचून झालेली हत्या ही समाजासाठी अत्यंत चिंताजनक बाब आहे. पोलिसांनी या प्रकरणात सर्व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले, तरी आरोपी कायद्याच्या पळवाटांमधून सुटू नयेत आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.



