🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज :- कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद; हातोडा आणि चाकूने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला — पत्नीचा घटनानंतर मृत्यू, पतीचाही उपचारादरम्यान मृत्यू; संशयित आरोपी फरिद शेख पोलिसांच्या ताब्यात
कुपवाड : विघ्नहर्ता कॉलनी परिसरात कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट दुहेरी हत्याकांडात झाल्याने कुपवाडसह सांगली जिल्हा हादरला आहे. शेजारी राहणाऱ्या केसरेकर दाम्पत्यावर हातोडा आणि चाकूने करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) यांचा मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी असलेले त्यांचे पती मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) यांचाही मंगळवारी (दि. १८ ऑगस्ट) मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेला आता दुहेरी हत्याकांडाचे स्वरूप आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केसरेकर दाम्पत्य आणि संशयित फरिद अब्दुल शेख (वय ५२) हे विघ्नहर्ता कॉलनी परिसरात एकमेकांच्या शेजारी राहतात. स्वातंत्र्यदिनी, शनिवार सकाळी घरातील कचरा टाकण्याच्या कारणावरून मनीषा केसरेकर आणि फरिद शेख यांच्यात किरकोळ वाद झाला. सुरुवातीला क्षुल्लक स्वरूपाचा असलेला हा वाद काही क्षणांतच गंभीर बनला.वादानंतर संतप्त झालेल्या शेख याने घरातून हातोडा आणि चाकू आणल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने मनीषा आणि मोहन केसरेकर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात मनीषा यांच्या डोक्यात तसेच पोटाच्या भागात चाकूने वार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तर मोहन यांच्या डोक्यावर हातोड्याने गंभीर घाव करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मनीषा केसरेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर गंभीर अवस्थेत मोहन केसरेकर यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही मंगळवारी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचाही मृत्यू झाला.दरम्यान, घटनेनंतर संशयित फरिद शेख हा घटनास्थळावरून पसार झाला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुपवाड एमआयडीसी पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून पोलिसांनी संशयित शेख याला अटक केली. त्याच्याविरुद्ध कुपवाडच्या औद्योगिक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपीला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार होते. मात्र, त्याचवेळी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मोहन केसरेकर यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यामुळे पोलिसांसमोरील तपासाचे स्वरूपही अधिक गंभीर झाले असून, प्रकरणात दुहेरी हत्याकांडाच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.किरकोळ वादातून दोन जीव गेल्याने परिसरात संताप कचरा टाकण्यासारख्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचा शेवट दोन निष्पाप जीवांच्या मृत्यूत झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. क्षुल्लक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचे धक्कादायक उदाहरण या घटनेमुळे समोर आले आहे. केसरेकर दाम्पत्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे करीत आहेत. हल्ल्यामागील नेमका घटनाक्रम, वादाचे कारण, हल्ल्याची पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.



