⭐नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार
DPT NEWS 🗞️📹✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भिवापूर :– आज दुपारी येथून दोन किमी अंतरावर असलेल्या मऱ्हू नदी पुलावर घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर क्षणभर थरारला. टाटा नेक्सॉन कार (क्र. एम.एच. ३६ ए.आर. १६८३) उमरेडकडे जात असताना चालक प्रफुल दामोदर राने (रा. पिलांद्री, ता. पवनी, जि. भंडारा) यांचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार पुलाच्या कडेला बसवलेल्या लोखंडी ड्रमला जोरात धडकली. क्षणात भीषण आवाज झाला, धक्का बसलेल्या कारमधील पाच प्रवाशांचे प्राण जणू एका क्षणासाठी तळहातावर आले.
वैभव नानाजी चौधरी (रा. मांगली), अभिलाष तुकाराम बोकडे, अमित केशव बोकडे, महेश भिवाजी बारेकर (सर्व राहणार पिलांद्री ता. पवनी जी. भंडारा ) हे सर्व उमरेड येथे दवाखान्यासाठी जात होते. दरम्यान ही दुर्घटना घडली. पुलावरून जाणारे नागरिक व वाहनधारकांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
मृत्यूच्या सावटातून सुरक्षित बाहेर पडल्याने प्रवाशांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी दिलासा व्यक्त केला.
—> ड्रम आणि मातीच्या ढिगाऱ्यांनी वाचवले पाच जीव
विशेष म्हणजे, याच ठिकाणी २३ ऑगस्ट रोजी अपघाताची मोठी घटना घडली. त्यात भरधाव कार नदीत कोसळून चालक सागर वाघमारे (रा. उमरेड) या तरुण व्यवसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ठाणेदार निर्मल यांनी पुढाकार घेत पुलाच्या कडेला लोखंडी ड्रम बसवून त्यांच्या बाजूला माती व खडीचे ढिगारे रचले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी केलेली ही उपाययोजना आज अक्षरशः पाच जणांचे जीव वाचवणारी ठरली.
आजच्या अपघाताने एक गोष्ट स्पष्ट झाली – अपघात टाळणे कदाचित आपल्या हाती नसते, पण योग्यवेळी केलेल्या सुरक्षात्मक उपाययोजना किती जीव वाचवू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. गावकऱ्यांसह प्रवाशांनी ठाणेदार निर्मल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या घटनेनंतर मात्र नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे – पुलावर अजून अधिक सक्षम सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे नाही का? कारण मृत्यूचा धोका अद्यापही या पुलावर घोंगावत असल्याची भीती लोकांतून व्यक्त होत आहे.



