DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️दर्शन पोलीस टाईम 🚨प्रतिनिधी- संदीप सकट
कोल्हापूर:- मौजे देवरवाडी गावातील जमिनीच्या मालकी कोष्टकीतून श्री वैजनाथ देव इनामदार, श्री वैजनाथ देव वहिवाट ही नावे कमी होऊन मूळ शेतकरी व त्यांचा रखडलेला वारसा नोंद होणे बाबत,तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीनधारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी होऊन कार्यवाही करण्याबाबत आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीन धारक पीडित मौजे देवरवाडी, महिपाळगड, कोनेवाडी गावातील ग्रामस्थांनी चंदगड चौकातून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले.
साधारणता ६५९ हेक्टर आर शेत जमीनीपैकी ९०% जमिनीच्या ७/१२ वर मालक कोष्टकी श्री वैजनाथ देव इनामदार, श्री वैजनाथ देव वहिवाट अशी नोंद असून त्या खाली शेतकऱ्यांच्या नावे दिसून येतात. गावातील लोक स्वातंत्र्य पूर्व काळापासून सदर जमीन कसत असून शेती हे एकमेव उपजीविकेचे साधन आहे. सदर जमिनीचे ७/१२ पत्रकी यापूर्वी वारस नोंद केले जात होते. पण 2021 च्या शासन निर्णयानुसार सदर जमिनीच्या वारस होणे बंद झालेले आहे. सदर जमीन भोगवटादार वर्ग २ मध्ये समावेश असून या सर्व बाबीमुळे गावातील शेतकऱ्यांना पिक कर्ज, शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. तसेच गावा लगत जंगली प्राणी यांचा वावर असल्याने जनावरांच्या मुळे झालेले कोणतेही पिक नुकसान भरपाई वगैरे मिळत नाही. सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय, कोल्हापूर यांच्याकडील श्री देव वैजनाथ या देवासाठी मौजे देवरवाडी या गावी नोंद असलेलेल्या शेरा जमीन या एकून २४ सर्वे नं आहेत. मूळ श्री देव वैजनाथ वरील २४ सर्वे नं मधील या जमिनी सोडून गावातील इतर सर्व जमिनी या राईट ऑफ रिव्हेन्यू असून त्या पोटी शेतकऱ्याकडून श्री वैजनाथ देवस्थान देखभाल कामी कर,फाळा दिला जात असे.तसेच शेरा जमिनी एकूण सर्वे नं २४ सोडून इतर जमिनीमध्ये यापूर्वी जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. फेरफार प्रमाणीत झालेले आहेत. तसेच काही सर्वे नं मधील जमिनी बिगरशेती (NA) झालेले आहेत त्यामुळे शेरा जमीन सोडून इतर गावातील सर्व जमिनी या देव वैजनाथ देवस्थानच्या देखभाल करण्यासाठी व फक्त महसूल गोळा करण्यासाठी असून शासनाने तो महसूल नियमित स्वरूपात भरून घ्यावा अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या रिट याचिका निकालाच्या अनुषंगाने मौजे देवरवाडी गावातील श्री. देव वैजनाथ देवस्थानच्या मालकीच्या जमिनी सोडून गावातील इतर सर्व जमिनी च्या ७/१२ मालक कोष्टकी मधून श्री वैजनाथ देव इनामदार, श्री वैजनाथ देव वहिवाट हि नोंद कमी होऊन मिळावी व सदर जमिनीच्या मालकीतील मयत खातेदारांचे सरळवारस नोंद करून मिळावेत,देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांच्याकडे परंपरेने चालत आलेल्या जमिनीला वारसा हक्काने नोंदी 7/12 पत्रकी नोंद व्हावी,तसेच काही शेतकऱ्यांच्या 7/12 पत्रकातील मालकी हक्काला परंपरागत नावे होती. ती इतर हक्कात घालण्यात आली आहेत. ती चुकीच्या पद्धतीने घातली आहेत. तरी पूर्वी प्रमाणे मालकी हक्कात समाविष्ट करण्यात यावीत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कार्यालयाच्या अखत्यारित असणाऱ्या शेतकऱ्यांचे खंड भरून घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते, तो खंड वेळेत भरून घेण्यात यावा. इतर हक्कात नोंदी असल्याने किंवा अन्य कारणाने पीक पाणी नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी होत नाही ती नोंद पूर्वीप्रमाणे घालून तसा 7/12 उतारा मिळावा. तसेच देवस्थान जमीन, ही कसणाऱ्यांच्या नावे मालकी हक्काने देण्यात यावी. कसेल
त्याची जमीन या कायद्याच्या आधारे करावी. इतर काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना कायम मालकी हक्क देण्यात आले आहेत त्या धर्तीवर अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हावी.अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्ह्यातील देवस्थान जमीन धारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्या, निवेदन तहसीलदार कार्यालयासमोर कॉ. संग्राम सावंत वाचन केले. सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीन धारक शेतकरी तसेच इतर सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे कॉ दशरथ दळवी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य व न्याय निर्णय व्हावेत अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही असे मत कॉ.शिवाजी गुरव यांनी मांडले.प्रा.डॉ.ॲड.नागेंद्र जाधव, शिवश्री संदीप भोगण, विजय भांदुर्गे यांनी आपल्या मनोगतात देवरवाडी गावातील देवस्थान धारक शेतकऱ्यांवरील अन्याय शासनाने दूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
चंदगडचे तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर न आल्याने बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार यांनी स्वतः येऊन शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले व स्वतःच्या कार्यालयात सदर विषयावर सखोल चर्चा केली.कॉ.ॲड.दशरथ दळवी यांनी मूळ विषय व न्याय मागणी बाबत कायद्याच्या आधारे विवेचन केले व शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगितली व देवरवाडी गावात याबाबत शिबीर आयोजित करण्याची मागणी केली.
सदर मोर्चाचे नेतृत्व कॉ. संग्राम सावंत,ॲड.दशरथ दळवी,कॉ. शिवाजी गुरव,
शिवश्री संदीप भोगण, प्रा.डॉ.ॲड.नागेंद्र जाधव,सामाजिक कार्यकर्ते संघर्ष प्रज्ञावंत,शंकर वैजनाथ भोगण, गोपाळ आडाव, उमेश भोगण विजय भांदुर्गे सह अन्य,अमृत भोगण,गोपाळ मेघो भोगण,देवरवाडी, महिपाळगड, कोनेवाडी गावातील बहुसंख्य पीडित शेतकरी वर्ग, महिलांवर्ग, सामाजिक व राजकीय श्रेत्रात काम करणारी मंडळी मोठयासंख्येने उपस्थित होती.



