DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – योगेश गवळे
नाशिक (येवला) : ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामपंचायतीवर तातडीने प्रशासक नेमण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देविदास सयाजी गुडघे, गणेश नानासाहेब गायकवाड (युवा शेतकरी उद्योजक) यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तहसीलदार, येवला यांना देखील पाठविण्यात आली आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती विकास आराखडा (सन २०२३-२४ ते २०२७-२८) अंतर्गत ममदापूर तांडा वस्ती, मल्हारवाडी, वैद्य वस्ती, शांतीनगर, आहिल्यादेवी नगर, साबळे वस्ती व बत्तासे वस्ती या भटक्या-विमुक्त जमातीच्या वस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र ग्रामसभेत न मांडता काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी संगनमताने मनमानी पद्धतीने आराखडा तयार केला असल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या माध्यमातून विकासनिधीचा अपहार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे कार्यकर्त्यांनी नमूद केले आहे. यापूर्वी दि. 01 सप्टेंबर 2025 रोजी गटविकास अधिकारी, येवला यांच्याकडे याबाबत तक्रार दिली असूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –
सुरु असलेली सर्व विकासकामे तात्काळ थांबवावीत व चौकशी होईपर्यंत नवीन प्रस्ताव मंजूर करू नयेत.
2019 पासून आजपर्यंत ग्रामपंचायतमार्फत झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी.
विद्यमान सरपंच यांनी कार्यवाहीच्या भीतीपोटी राजीनामा दिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असणारी चौकशी समिती नेमावी.
भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या ग्रामपंचायतीवर पुढील निवडणूक होईपर्यंत प्रशासक नेमावा.
चौकशी झाली नाही तर उपोषणाच्या माध्यमातून दाद मागण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनातून दिला आहे.



