सामान्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना उमेदवारी का नाही?
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव
कोल्हापूर:- कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसा पैसा विरुद्ध कार्य हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
गाव पातळीवर वर्षानुवर्षे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, संकटाच्या काळात धावून जाणारे, समाजासाठी-झटणारे कार्यकर्ते, सामान्य पार्श्वभूमी असलेले उमेदवार निवडणुकीच्या वेळी मात्र मागे पडतात, तर पैशांची ताकद, गटबाजी आणि दिखाव्याच्या श्रीमंतीच्या बळावर उमेदवार मैदानात उतरतात आणि निवडून येतात. त्यामुळे मतदारांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की पैसे असेल तरच निवडणुक लढवावी का? याचा मतदारांनी आज विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि निवडून आल्यानंतर तो सर्व पैसा वसुल करतात. प्रचारासाठी गाड्या, पोस्टर-बॅनर, जेवणावळी, माणसे फिरवणे, यासाठी लाखोंचा खर्च होत असल्याने ज्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नाही अशा कार्यकर्त्यांना सुरुवातीपासूनच स्पर्धेत अडचणी येतात. हेच कार्यकर्ते वर्षानुवर्षे सामाजिक कामात गुंतलेले असतात, लोकांच्या अडीअडचणीत हजर असतात, पण मतदानाच्या वेळी मतदारवर्ग तो चांगला माणूस आहे एवढेच सांगतात, मत मात्र पैशावर, राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांच्या वारस, नातेवाईक किंवा गटबाजीत आधारलेल्या उमेदवारांनाच देतात. त्यामुळे खरे सामाजिक कार्यकर्ते उपेक्षित, वंचित राहतात. निवडणुकीत कोलमडतात आणि पैशाच्या जोरावर निवडणूक लढवणा-यांचा विजय होतो. लोकशाहीत मतदार राजा असतो, पण जर मतदारांनी सजगपणे विचार न करता पैशावर, लोभावर, मटणाच्या फोडासाठी व पैसा प्रमाण मानून त्यावर आधारित मतदान केले, तर विकासाच्या प्रश्नांवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. निवडणुकीत पैसा वाटणारे उमेदवार लोकांसाठी नव्हे तर स्वतःच्या फायद्यासाठी गुंतवणूक करतात आणि नंतर ती वसूल करतात, ही कटू वस्तुस्थिती आहे. समाजासाठी सातत्याने काम करणाऱ्यांना खरा पाठींबा मिळावा यासाठी मतदारांनीआपली मानसिकता बदलण्याची आणि विकासाला प्राधान्य देणाऱ्या सामान्य उमेदवाराला मतदान करण्याची गरज आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्यभर सतरंज्या उचलाव्यात, पडेल ती कामे करावी, प्रसंगी अनेक आरोप, गुन्हे, केसेस अंगावर घ्याव्या पण तिकीट मात्र त्याने मागूच नये अशीच परंपरा चालत आलेली आहे.
अनेक कार्यकर्ते आपल्या गावात, मतदारसंघात लोकांमध्ये काम करून नाव निर्माण करतात. परंतु तिकीट वाटपाच्या वेळी गटबाजी, आर्थिक ताकद, वरच्या स्तरावरील शिफारसी, राजकीय सौदेबाजी, यांना प्राधान्य दिले जाते. परिणामी, जमिनीवर खऱ्या अर्थाने पक्षासाठी घाम गाळणारे कार्यकर्ते उपेक्षित राहतात. त्यांना तू तर आपला आहेस या एका वाक्यात शांत केले जाते. हे कार्यकर्ते वर्षानुवर्षे नेतृत्वाची मान मरातब, सांभाळतात, सभा सजवतात, पोस्टर लावतात, बॅनर वाहतात, सतरंज्या उचलतात जनतेत प्रचार करतात, पण निर्णायक क्षणी त्यांच्यासाठी दरवाजे बंद होतात.हेच आज पर्यंतचे वास्तव आहे यात बदल होईल याची शक्यता नसल्याने प्रामाणिक कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यात नाराजीचा सूर उमटत आहे. परंतु राजकीय खुर्चीसाठी अनेकांचा बळी घेणारे, वर्षानुवर्षे सत्तेची दारे आपल्याच खानदानात ठेवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या चतुसूत्रीत परिपूर्ण असलेले राजकीय पट्टू यांना सामान्य कार्यकर्त्यांचे काही सोयर सुतक नसते हेच खरे वास्तव आहे आणि हेच समाजासाठी घातक आहे.



