DPT NEWS NETWORK🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – संदिप अहिरे
धुळे: वलवाडी-भोकर परिसरातील आदिवासी वस्तीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक विजय देवरे आणि रंगनाथ ठाकरे यांनी महापौर मायादेवी परदेशी व उपमहापौर जोस्तनाताई पाटील यांना लेखी निवेदन देऊन हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
दैनंदिन जीवनात पाण्यासाठी कसरत
वलवाडी-भोकर येथील आदिवासी वस्तीत पाणीपुरवठा अनियमित आणि अपुरा असल्याने नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत मनपा प्रशासनाकडे धाव घेतली.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
- आदिवासी वस्तीचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात यावा.
- जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी.
- कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत पर्यायी पाणी योजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा.
यावेळी महापौरांनी निवेदनाचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. या मागणीमुळे वस्तीतील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, लवकरात लवकर नळाला पाणी येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



