DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
नंदुरबार:- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि कृषी दिनाच्या औचित्याने दि. १ जुलै रोजी वडाळी येथे भव्य कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय, शहादा येथील अंतिम वर्षाच्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी, वडाळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजित केला होता.
हा मेळावा ग्रामपंचायत कार्यालय वडाळी येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयाबाई दीपक ठाकरे लोकनियुक्त सरपंच वडाळी होते. प्रमुख अतिथी म्हणून मनोज चौधरी सरपंच बामखेडा, नितीन पाटील उपसरपंच बामखेडा, अभय गिर गोसावी उपसरपंच वडाळी व कल्पनाताई मोहिते, आदींची उपस्थिती होती.मुख्य मार्गदर्शक प्राध्यापक विलास पाटील यांनी माती व खत व्यवस्थापन पपई आणि केळी पीक या महत्त्वाच्या कृषी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने शेतकऱ्यांमध्ये नव्या पद्धतींची समज वाढली. यानंतर महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या काही कृषीदूत विद्यार्थ्यांनी आधुनिक शेतीकामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध कृषी साधनांची प्रात्यक्षिके शेतकऱ्यांपुढे व प्रमुख पाहुण्यांसमोर सादर केली. या प्रात्यक्षिकांमध्ये मजूर बचत, वेळेची बचत व अचूकता यावर विशेष भर देण्यात आला.कार्यक्रमाचे संयोजन कृषीदूत विद्यार्थ्यांनी केले असून सूत्रसंचालन अजय नेरकर, प्रस्तावना भावेश सूर्यवंशी , तर आभार प्रदर्शन अभिषेक मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला वडाळी बामखेडा शेजारील नगर गावांमधील शेतकरी बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित होते.कृषी तंत्रज्ञान, प्रात्यक्षिकं आणि मार्गदर्शन यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगला प्रतिसाद उमटला. विद्यार्थ्यांनी घेतलेला पुढाकार आणि शेतीविषयक माहिती आम्हाला थेट शेतीच्या कामात उपयोगी ठरेल, अशा सकारात्मक प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.कृषी दिनाच्या निमित्ताने पार पडलेला हा मेळावा शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना ठरला, तर विद्यार्थ्यांसाठी अनुभवाचे व नेतृत्वाचे अमूल्य व्यासपीठ बनला. अशा उपक्रमांमुळे शैक्षणिक संस्था आणि ग्रामीण समाज यांच्यातील सेतू अधिक मजबूत होतो, हे या मेळाव्याने ठळकपणे अधोरेखित केले.



