DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संजय गुरव
नंदुरबार : बालविवाहांना प्रतिबंध करणे तसेच महिलांविषयक कौटुंबिक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन अक्षता’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत साडे पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३३ बालविवाह रोखण्यात नंदुरबार पोलिसांना यश आले आहे. नुकताच धडगाव तालुक्यातील उकळी आंबा येथे नियोजित बालविवाह पोलिसांनी रोखला.बालविवाहांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने पुढाकार घेतला असून ऑपरेशन अक्षता मोहिम राबविण्यात येत आहे.या मोहिमेतंर्गत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच बालविवाह रोखण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. रविवारी (दि. २०) धडगाव पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांना मिळालेल्या माहितीनुसार उकळी आंबा गावात एका अल्पवयीन मुलीचा चितार फॉरेस्ट (ता. धडगाव) येथील तरुणाशी बालविवाह होणार असल्याचे समजले. सदरची माहिती घडगांव पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविली. त्यांनी सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार धडगाव पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण यांनी धडगाव पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या मदतीने माहिती घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीत तथ्य असल्याचे समजले. यामुळे विवाहापूर्वीच इशामोद्दीन पठाण व त्यांच्या पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, वर मुलगा व त्यांचे कुटुंबीय व गावातील नागरिक कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन बालविवाह करण्यापासून परावृत्त करत समुपदेशन करुन मनपरिवर्तन केले. तसेच मार्गदर्शन करुन जनजागृती केली.
अल्पवयीन मुलीच्या व वर मुलाच्या पालकांना सदरची बाब पटल्याने त्यांनी १ मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करणार असल्याची हमी दिली. तसेच अल्पवयीन मुलगी व वर मुलाच्या पालकांना धडगाव पोलीस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली धडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इशामोद्दीन पठाण, पोलीस उप निरीक्षक राहुल पाटील, पोलीस नाईक दिपक वारुळे, पोलीस अंमलदार हिरालाल सोनवणे यांनी केली आहे.



