वाहन चालक त्रस्त
वाहतूक पोलिसांची रात्रीची भटकंती चर्चेत
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
नागपूर :- मागील काही आठवड्यात नागपूर – भिवापूर मार्गावर वाहतूक शाखेच्या पथकातील पोलिसांच्या कारवाया वाढल्या असुन चालानची भिती दाखवून वाहन चालकांचे खिसे रिकामे केले जात असल्याची ओरड आहे.
चांपा टोल नाका परिसर वाहतूक पोलिसांचा अड्डा झालेला आहे. दिवसा कधीही वाहतूक शाखेचे कर्मचारी येथे वाहने अडवीतांना नजरेस पडतात. वाहने थांबवून चालकांकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली जाते. एखादा कागद कमी आढळला, किंवा वाहनात एखादी अधिकची सवारी मिळून आली कि अशा वाहनचालकाला सावज बनविल्या जाते. प्रारंभी चालकांना वेगवेगळ्या कलमांतर्गत वाहन चालान करण्याची भीती दाखवीण्यात येते. मात्र ‘ लक्ष्मी दर्शन ‘ झाले की वाहने सोडली जातात. अनेकदा वाहनांची कागदपत्रे जप्त करण्याची भिती दाखवुनही चालकांचे खिसे रिकामे केले जात आहेत. काही महिन्यांपूर्वी पथकातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांनी आल्या आल्याच या मार्गावर आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केल्याचे समजते.
—> वाहतूक पोलिसांची रात्रीची भटकंती
वाहतूक शाखेचे काही कर्मचारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या खाजगी वाहनाने नागपूर भिवापूर मार्गावर फिरताना दिसतात. वाळू, गिट्टी, मुरूम आदी गौन खनिज वाहून नेणारी वाहने या वाहतूक पोलिसांचे टारगेट आहेत. या वाहनांकडून एन्ट्री वसुलीसाठी ते मुद्दाम रात्री व पहाटेच्या सुमारास खाजगी वाहनाने महामार्गावर भटकत असल्याची माहिती आहे. याबाबत वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी मसकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती नसल्याचे सांगितले.



