DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- डॉ. सुखदेव काटकर
लाखांदूर : महाराष्ट्रात नेहमीच फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असतात आर्थिक गुन्हे शाखेतील अधिकारी जनतेस न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच ठिकाणी बोगस कंपन्या व त्यांचे ऑफिस थाटले जातात त्या माध्यमातून लोकांना गुंतवणुकीवर मोठे परतावे देण्याचे आमिष दाखवले जाते, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनतेची आर्थिक फसवणूक केली जाते. असाच प्रकार विदर्भात घडला. लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात व्याज व आवश्यकतेनुसार गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याचे आमिष देणाऱ्या एका बोगस कंपनीच्या पाच जणांनी संगनमत करून तब्बल ७ नागरिकांची १ कोटी १६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून ४ आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी झडती घेत आरोपींचे मोबाइल, लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त केले.
आरोपींनी फिर्यादींना ‘जीटी कोर एसटी कन्सल्टन्सी’ नामक बोगस कंपनीत लाखो रुपयांच्या गुंतवणुकीवर अधिक व्याजाच्या रकमेसह प्रतिमाह हजारो रुपयांची रक्कम देण्याचे आमिष दिले होते. या आमिषाला बळी पडून सात जणांनी प्रत्येकी लाखो रुपये एकत्र करीत १ कोटी १६ लाख रुपयांची रक्कम त्या बोगस कंपनीत गुंतवणूक केली होती.
फेब्रुवारी २०२३ ते जून २०२४ पासून घटनेतील गुंतवणूकदारांना व्याजासह प्रतिमाह उपलब्ध होत असलेली राशी बंद करण्यात आली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी चिंता व्यक्त करीत आरोपींना गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्याची मागणी केली होती. मात्र, वर्षभरापासून गुंतवणूकदारांशी संपर्क तोडून गुंतवणूक केलेली राशी परत केली नसल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे.
याप्रकरणी भंडारा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चौघांना अटक करून न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने चार आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.



