DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨🚨 प्रतिनिधी:- रमजान मुलाणी
सांगली :- कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) फाट्यावर असलेल्या मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण, निकृष्ट भोजन आणि व्यवस्थापनाकडून अयोग्य वागणुकीचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणाने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पालकांनी थेट शाळेत धाव घेऊन संस्थाचालक मोहन माळी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांची धक्कादायक तक्रार: जेवणात अळ्या, किडे आणि मिक्सरचे ब्लेड शाळेतील भोजन व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे गंभीर तक्रारी केल्या आहेत. जेवणामध्ये अळ्या, किडे, माशा आणि मिक्सरचे ब्लेड सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास झाला, मात्र त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत दिली गेली नाही.
“तक्रार केली तर मारहाण आणि शिवीगाळ” – विद्यार्थ्यांचा आरोप
विद्यार्थ्यांनी सांगितले की, संस्थाचालक मोहन माळी यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत अमानुष मारहाण केली. अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शारीरिक त्रास झाला असून शाळेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पालकांचा संताप उफाळला, पोलिसांत कारवाईची मागणी करत मुंबई व पुण्यातील २२ विद्यार्थ्यांचे पालक गुरुवारी (दि. १७ जुलै) शाळेत आले. त्यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात जाऊन आपल्या मुलांना शाळेतून ताब्यात घेण्याची व शाळेच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपाने सर्व विद्यार्थी पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून शाळेच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.”मुलाला रक्त येईपर्यंत मारले” असे पालक विजय टिके यांचा आरोप आहे, मुंबईतील पालक विजय तुकाराम टिके यांनी भावनिक आविष्कार करत सांगितले, “माझ्या मुलाला रक्त येईपर्यंत मारहाण केली गेली. अन्नामध्ये किडे असूनही तेच अन्न खाण्यास भाग पाडले गेले. पोटदुखी झाली, तरी डॉक्टर दाखवले नाहीत. आमच्या मुलांचे भवितव्य अशा शाळांमध्ये सुरक्षित नाही.” गटशिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई : त्रिसदस्यीय आणि पाच सदस्यीय समिती स्थापन करीत या घटनेची गंभीर दखल घेत पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास साबळे यांनी प्राथमिक त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केल्याचे सांगितले. पुढील टप्प्यात पाच सदस्यीय समितीमार्फत संपूर्ण तपशीलवार चौकशी करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर काही सामाजिक कार्यकर्ते शाळेत दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना धीर देत दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.



