पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आरोपींवर ‘मकोका’खाली गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी
DPT NEWS ✍️🗞️📰🗞️✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – रमजान मुलानी
सांगली : त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या घटनेचा सांगली जिल्ह्यातील जन ग्रामीण पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन जन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे, प्रदेशाध्यक्ष देवानंद अहिरे, राज्यकार्याध्यक्ष युवराज देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
काय घडले?
त्र्यंबकेश्वर शहरात खासगी पार्किंग वसुली ठेकेदारांकडून सुरू असलेल्या मनमानीविरोधात वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या टीव्ही चॅनेल प्रतिनिधी योगेश खरे, योगेश सोनवणे आणि किरण तांजने यांच्यावर काही व्यक्तींनी अचानक हल्ला चढवला. पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यापैकी किरण तांजने यांना गंभीर दुखापत झाल्याने ते आयसीयूमध्ये उपचार घेत होते. या घटनेनंतर पत्रकार समाजात संतापाची लाट पसरली आहे.
लोकशाही मूल्यांवर आघात
पत्रकार हे समाजातील अन्याय, अडचणी व सत्य समोर आणण्यासाठी कार्यरत असतात. त्यांच्यावर हल्ले होणे म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर सरळसरळ आघात असून, हे लोकशाहीच्या मूल्यांना धोका निर्माण करणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. पत्रकारांवर वाढत्या प्रमाणात होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलली नाहीत, तर याचे दूरगामी परिणाम होतील, असा इशारा जन ग्रामीण पत्रकार संघाने दिला आहे.
कठोर कारवाईची मागणी
जन ग्रामीण पत्रकार पत्रकार संघटनेने दिलेल्या निवेदनात काही ठोस मागण्या पुढे मांडण्यात आल्या आहेत :
आरोपींवर ‘महाराष्ट्र नियंत्रण संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने न्यायालयात उभे करावे.
भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पोलिस प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवाव्यात.
जन ग्रामीण पत्रकार संघ, सांगली जिल्हाध्यक्ष रमजान मुलानी, मिरज तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार, खानापूर तालुकाध्यक्ष रवींद्र पवार, जत तालुकाध्यक्ष दत्ता पाटसे, तसेच सारथी महाराष्ट्र न्यूजचे जिल्हाध्यक्ष बंडू कनिरे, सचिन शिरढोणे, दीपक बाबर निवेदन सादर करताना उपस्थित उपस्थित होते.
प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत
पत्रकार संघटनेने पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, “पत्रकार सुरक्षेला शासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे. अशा हल्ल्यांच्या घटना पुन्हा घडल्यास राज्यभर पत्रकार आंदोलन उभारण्याचा विचार केला जाईल.”
या निषेध नोंदवणीदरम्यान पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकारांनी संतापाच्या भावना व्यक्त केल्या आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.



