राजकारणी गप्प; प्रशासनाचा कानाडोळा
त्या युवा नेत्याला वेसण घालण्याची गरज
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
उमरेड :- येथील एमआयडीसी परिसरातील टायर कंपन्यांकडून उघड्यावर टायर जाळले जात असून त्यातून प्रचंड प्रमाणात उठणारा काळाकुट्ट धुर व दुर्गंध शहराचे वातावरण प्रदूषित करीत आहेत. त्यामुळे उमरेडकरांना श्वास घेणे कठीण झाले आहे. दररोज चालणारा हा प्रकार थांबावा यासाठी नागरिकांतर्फे वारंवार अर्ज विनंत्या करण्यात आल्यात. परंतु टायर कंपन्यांच्या मालकांकडून केली जात असलेली ‘विशेष कृपा’ व स्थानिक राजकारण्यांचा प्रभाव या दोन्ही खाली दबलेले प्रशासन उपाययोजना करायला तयार नाही. लोकप्रतिनिधिंबाबतही हीच स्थिती असून टायर कंपन्याच्या मुजोरीला वेसण घालण्याकरिता तेही पुढाकार घेताना दिसत नाही.

एमआयडीसी परिसरात एकूण आठ टायर कंपन्या आहेत. येथे टायरापासून तेल काढण्याचे व तार वेगळे करण्याचे काम नियमित सुरु असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जुने टायर जाळले जातात. टायर जाळन्याकरिता चिमणीचा वापर करणे आवश्यक आहे. जेणेकरून निघणारा धूर आजूबाजूला न पसरता वर आकाशात जाईल. परंतु कंपनी चालक चिमण्यांचा वापर न करता उघड्यावर टायर जाळतात. सायंकाळ झाली की त्यांचा हा कार्यक्रम सुरु होतो. त्यातून उठणारे धुराचे लोट वातावरणात मिसळतात. त्यामुळे सर्वत्र धूर व दुर्गंध पसरून श्वास घेणे कठीण होते. नागपूर, भिवापूर, गिरड, मोहपा आदी मार्गांवर असलेल्या वस्त्या, बायपास चौक, परसोडी, भिसी नाका परिसरापर्यंत धूर व दुर्गंधीचा त्रास जाणवतो.
वातावरणात मिसळणाऱ्या धुरामुळे रात्रीला नागरिकांना श्वासोच्छवास करणे कठीण होते. त्यातूनच आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. घरे, वृक्ष, रस्ते, वाहने आदींवर धुराची काजळी जमा झालेली दिसून येते. टायरच्या धुरामुळे निर्माण झालेली प्रदूषणाची समस्या कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी मागील दोन वर्षांपासून उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रारी करण्यात येत आहेत, मात्र तात्पुरती मलमपट्टी करण्यापलीकडे त्यांच्याकडून काही करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
त्या पक्षाच्या नेत्यांनी युवा पदाधिकाऱ्याला आवरावे
टायर कंपन्या चालवीणाऱ्यांपैकी दोन तीन जण वगळलेत तर इतर सर्व मंडळी बाहेरची आहेत. जे स्थानिक दोन तीन आहेत त्यातील एक जण एका राजकीय पक्षाचा युवा पदाधिकारी असल्याचे समजते. या पदाधिकाऱ्याला त्याच्या पक्षाच्या येथील नेत्याचे पाठबळ असल्याने तो प्रशासनावर दडपण आणतो. त्यामुळे टायर कंपन्याविरुद्ध वारंवार तक्रारी होऊनही अधिकारी दखल घेत नाही. पाठबळ देणाऱ्या नेत्याने उमरेडकरांसाठी ताप ठरु लागलेल्या त्या युवा पदाधिकाऱ्याच्या कुकृत्यावर वेसन घालावे सोबतच टायर कंपन्यांचा होणार त्रास थांबवावा अशी मागणी आहे.



